Devendra Fadnavis : महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पूर यामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. सुमारे तासभर चाललेल्या या महत्त्वाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गंभीर पूरस्थितीची माहिती पंतप्रधानांना दिली आणि राज्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून (NDRF) तातडीने भरीव मदत करण्याची मागणी केली.
मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहीने नुकसानीचा तपशील देणारे एक निवेदनही पंतप्रधान मोदींना सादर केले.
एनडीआरएफमधून तातडीच्या मदतीवर भर
बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “मी पंतप्रधानांना राज्यातील पूरस्थिती आणि झालेले नुकसान याची संपूर्ण कल्पना दिली आहे.” राज्यातील या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने एनडीआरएफमधून तातडीने मोठी मदत करावी, अशी विनंती त्यांनी केली.
या मागणीवर पंतप्रधान मोदींनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, राज्याचा नुकसानीचा सविस्तर प्रस्ताव आल्यानंतर त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
कर्जमाफीऐवजी ‘तात्काळ मदत’ प्राधान्यावर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सध्या तात्काळ मदतीची गरज असल्याचे स्पष्ट केले. “कर्जमाफीचे आश्वासन आम्ही निश्चितपणे पूर्ण करू, पण सध्या आमचे प्राधान्य शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यावर आहे,” असे त्यांनी सांगितले.Devendra Fadnavis
राज्याच्या विकासाच्या प्रकल्पांवरही चर्चा
या बैठकीत केवळ आपत्कालीन मदतीवरच नव्हे, तर राज्याच्या दीर्घकालीन विकासाला गती देणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवरही चर्चा झाली.
१. महाराष्ट्रात तीन ‘संरक्षण कॉरिडॉर’ची योजना राज्यात संरक्षण उत्पादन (Defence Manufacturing) क्षेत्राची मोठी इकोसिस्टीम तयार करण्यासाठी तीन संरक्षण कॉरिडॉर प्रस्तावित आहेत. ज्यामुळे अर्थव्यवस्थेला आणि रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळेल. हे कॉरिडॉर पुढीलप्रमाणे आहेत:
- पुणे – अहमदनगर (अहिल्यानगर) – छत्रपती संभाजीनगर
- नाशिक – धुळे
- नागपूर – वर्धा – अमरावती
२. गडचिरोलीत ‘स्टील हब’ बनवण्याची क्षमता गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी येथील स्टील निर्मितीच्या क्षमतेवर चर्चा झाली. गडचिरोलीत देशातील सर्वात स्वस्त आणि ‘ग्रीन स्टील’ (Green Steel) तयार करण्याची क्षमता आहे. योग्य नियोजन केल्यास चीनपेक्षा कमी दरात स्टील उत्पादन करणे शक्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना सांगितले.
नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचेच नाव मिळणार
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाबद्दल बोलताना फडणवीस यांनी यावर आपली ठाम भूमिका मांडली. “विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव दिले पाहिजे, असा प्रस्ताव आम्ही केला आहे आणि केंद्र सरकारची भूमिकाही त्याला अनुकूल आहे. नामकरणाची प्रक्रिया केंद्रात सुरू असून, लवकरच विमानतळाला त्यांचेच नाव मिळेल, असा मला विश्वास आहे.”Devendra Fadnavis
पंतप्रधान मोदींचा ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र दौरा
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असल्याची माहिती दिली. मुंबईत होणाऱ्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय फिनटेक फेस्टिव्हलला (Fintech Festival) ते उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यात नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रो-३ चे उद्घाटन होण्याचीही शक्यता आहे.
पूरग्रस्त महाराष्ट्राला केंद्राकडून तातडीने आणि पुरेशी मदत कधी मिळते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.Devendra Fadnavis